Mon, Dec 29, 2025

गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वाचे महत्व नेमके काय? दुर्वा अर्पण करण्याची योग्य पध्दत जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
गणपतीच्या पूजेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा. शास्त्रात म्हटलं आहे की, गणेशपूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...
गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वाचे महत्व नेमके काय? दुर्वा अर्पण करण्याची योग्य पध्दत जाणून घ्या!

गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. घराघरांत बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नैवेद्य, सजावट आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. पण गणपतीच्या पूजेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा. शास्त्रात म्हटलं आहे की, गणेशपूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. मात्र या दुर्वा कोणत्या बोटाने, कुठे आणि किती वाहाव्यात याची विशिष्ट पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया दुर्वा वाहण्याचं महत्व आणि धार्मिक पद्धत.

गणपती बाप्पाच्या पूजेच दुर्वा का वाहतात?

श्रीगणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय मानली जाते. पुराणानुसार, गणपती बाप्पाने अनलासुर दैत्याचा वध केल्यानंतर शरीराची उष्णता शांत करण्यासाठी दुर्वा अर्पण केल्या गेल्या. तेव्हापासून दुर्वा गणेश पूजेत आवश्यक मानल्या जातात. दुर्वा त्रिदळ स्वरूपात अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते. दुर्वा अर्पण केल्याने बुद्धी, आरोग्य, संपत्ती आणि आयुष्य वाढते असा विश्वास आहे. गणपतीची कृपा मिळण्यासाठी प्रत्येक पूजेत दुर्वांचा समावेश करावा असा शास्त्रांचा आदेश आहे. दुर्वा शुद्धता, पावित्र्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे गणेशपूजेत दुर्वेचे महत्व अपार आहे.

गणेशाचे मुख गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहिल्या जातात, असे शास्त्र सांगते. दुर्वा या अनंत मुळांनी वाढतात, सतत विस्तारत राहतात. त्यामुळे वंशवृद्धी आणि समृद्धी यासाठी गणेशाला दुर्वा अर्पण केल्या जातात. जीवन हे जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकलेले आहे. संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. याशिवाय दुर्वा सर्व दोषांचा नाश करतात, संकटं दूर करतात आणि शुभफल देतात असा धार्मिक समज आहे. पुराणांनुसार दुर्वांची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या रोमकूपातून झाली, म्हणूनही त्या पवित्र मानल्या जातात.

श्री गणेशाच्या पूजेत दुर्वा वाहण्याची पद्धत

गणेशपूजेत अर्पण करण्यासाठी दुर्वा हिरव्या, ताज्या आणि स्वच्छ असाव्यात. शक्यतो त्या श्वेतवर्ण मिश्रित म्हणजेच किंचित पांढऱ्या रंगाच्या असाव्यात असे शास्त्र सांगते. दुर्वा नेहमी तीन किंवा पाच पानांच्या असाव्यात. अशा दुर्वांना शुभ मानलं जातं आणि त्या गणपतीला वाहाव्यात. गणेशाला नेहमी २१ जुड्या दुर्वा वाहाव्यात अशी परंपरा आहे. यामागे धार्मिक कारणही आहे. योगशास्त्रानुसार जीवाला २१ प्रकारची दुःखं भोगावी लागतात. त्या दुःखांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी गणेशाला २१ दुर्वा वाहण्याची प्रथा रूढ झाली आहे.

गणेशाला दुर्वा अर्पण करताना योग्य पद्धत पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकजण दुर्वा सोंडेवर, पायाशी किंवा कुठेही ठेवतात. पण शास्त्र सांगते की, दुर्वा नेहमी करणे (कान) किंवा शिरसी (डोक्यावर) वाहाव्यात. तसेच त्या वाहण्याची बोटांची विशिष्ट पद्धत आहे. दुर्वा नेहमी अनामिका, मध्यमा आणि अंगठा या तीन बोटांनी वाहाव्यात. असे केल्याने पूजा शास्त्रानुसार पूर्ण होते. गणेशपूजेत दुर्वा वाहणे ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे खोल धार्मिक अर्थ दडलेला आहे. वंशवृद्धी, समृद्धी, दुःखांचा नाश आणि मोक्षप्राप्ती यासाठी दुर्वा अर्पण करण्याची पद्धत शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला दुर्वा वाहताना ही योग्य पद्धत नक्की पाळा.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.