मुंबई – राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. एनडीआरएफचं एक पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.
हवामान अंदाजाचे २० अलर्ट संदेश ३४ कोटी नागरिकांपर्यंत
SACHET platform चा वापर करून हवामान अंदाजाचे २० अलर्ट संदेश ३४ कोटी नागरिकांपर्यंत लघुसंदेशच्या (SMS) माध्यमातून पोहचवण्यात आले आहेत. मुंबईत विविध २४ ठिकाणी पाणी साचले असून पाणी निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.





