तळपायांची सतत आग होते का ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Published:
वाढत्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते? ‘या’ घरगुती पद्धतीने मिळेल आराम....
तळपायांची सतत आग होते का ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांची आग होण्याची समस्या बहुतेकांना जाणवते. अनेकांना तळव्यांची जळजळ होण्याची समस्या केवळ उन्हाळ्यातच नाहीतर एरवीही जाणवते. उन्हाळ्यात किंवा एरवीही पायांच्या तळव्यांची आग होण्यामागे अनेक कारणं असतात. पायांच्या तळव्यांमधील उष्णता वाढणं आणि अचानकच पायांची आगआग व जळजळ होणे हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक त्रासदायक अनुभव असू शकतो. यामुळे चालणं आणि रात्री झोपतानाही त्रास होतो. हे लक्षण सामान्यत: ताणतणाव, रक्ताभिसरणाच्या समस्यांमुळे किंवा शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता यामुळे होते. यामुळे कधी कधी चालणे देखील कठीण होऊ शकते आणि रात्रीच्या झोपेत व्यत्यय येतो. अशावेळी अगदी साधेसोपे उपाय करून काही मिनिटांत आराम मिळवू शकता. लगेच जाणून घ्या…

तिळाच्या तेलाने मसाज करा

तिळाचे तेल हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. तिळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांवर हळुवार मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि जळजळ कमी होते. तिळाचे तेल त्वचेत खोलवर जाऊन आराम देण्यास मदत करते. मसाज केल्याने पायांना ताजेतवाने वाटते आणि तळव्यांची जळजळ कमी होते. तिळाच्या तेलात काही थेंब लवंग तेल घालून मसाज केल्यास अतिरिक्त आराम मिळतो.

बर्फाच्या पिशवीचा किंवा पाण्याचा वापर करा

बर्फाची थंडगार पिशवी ही जळजळीवर एक प्रभावी उपाय आहे. बर्फाची पिशवी पायांच्या तळव्यांवर ठेवून काही वेळ धरून ठेवावी. यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि सूज कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्याने तळव्यांतील जळजळ कमी होते आणि पायांना आराम मिळतो. मात्र, बर्फाचा थेट त्वचेशी संपर्क येऊ देऊ नये, त्याऐवजी कापडात गुंडाळून बर्फ लावावा. जर हे शक्य नसेल तर टबमध्ये किंवा बादलीत बर्फाचे पाणी घ्या आणि त्यात पाय बुडवून बसा.

निलगीरीचे तेल

निलगीरीच्या तेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पायांची आग किंवा जळजळ शांत करण्यासाठी निलगिरीचे तेल पायांवर नक्की लावा आणि मसाज करा. पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होणे हा एक सामान्य परंतु त्रासदायक अनुभव असू शकतो. मात्र, घरच्या घरी सोप्या उपायांनी हा त्रास कमी करता येतो. या उपायांचा नियमित वापर केल्यास पाय निरोगी आणि ताजेतवाने राहू शकतात.

सैंधव मीठ

सैंधवामध्ये असलेल्या मॅग्नेशियम सल्फेटमुळेही गुण येतो. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव मीठ घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. मात्र हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews