बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार; परिवहन मंत्र्यांचे आदेश

Written by:Rohit Shinde
Published:
बेकायदेशीरपणे किंवा नियमबाह्य पद्धतीने सेवा देणाऱ्या अ‍ॅप-आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला.
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार; परिवहन मंत्र्यांचे आदेश

बाईक टॅक्सी सेवा ही एक वेगवान, किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा आहे. ट्रॅफिकच्या गर्दीतून सहज मार्ग काढत बाईक टॅक्सी कमी वेळात ठिकाणी पोहोचवते. यामुळे वेळेची बचत होते आणि कमी दरात प्रवास शक्य होतो. ओला बाईक, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे ही सेवा सहज बुक करता येते. ही सेवा विशेषतः एकट्या प्रवाशांसाठी उपयुक्त आहे. कामाच्या वेळेत, ऑफिस, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बाईक टॅक्सी उत्तम पर्याय आहे.

पेट्रोल खर्च, प्रदूषण आणि ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरते. तरुण वर्गात हिची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच पुढे परवानगी व पाठिंबा दिला जाणार आहे. बेकायदेशीरपणे किंवा नियमबाह्य पद्धतीने सेवा देणाऱ्या अ‍ॅप-आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला.

बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर कारवाई होणार

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर संपूर्ण मोटार परिवहन विभाग सतर्क झाला आहे. रॅपीडो, उबेरसह इतर काही ॲप-आधारित कंपन्या परवाना नसताना प्रवासी वाहतूक करत असल्याचे उघड झाल्यानंतर ही मोठी कृती केली जात आहे. नुकतेच जाहीर केलेल्या ई-बाईक धोरणाच्या पार्श्वभूमीवरही अनेक कंपन्या नियम न पाळता सेवा सुरू करत असल्याचे आढळल्याने सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे.

मंत्र्यांनी स्पष्ट केलं की अनेक कंपन्या प्रशिक्षणाविना चालकांना खासगी बाईकवर प्रवासी सेवा देण्यास लावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे. अलीकडील एका अपघातात अवैध बाईक टॅक्सीवर प्रवास करताना प्रवाशाचा मृत्यू झाल्याने या तक्रारींना अधिक गांभीर्य प्राप्त झाले. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या बाईक टॅक्सी चालवण्याचा प्रकार अजिबात चालणार नाही. चालकांचे शोषण करणाऱ्या, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर सतत कारवाई केली जाईल. याउलट नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या आणि प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाच शासनाचा पाठिंबा असेल.

बाईक टॅक्सीला नियम आणि अटींचे बंधन

बाईक टॅक्सीच्या धोरणात व सेवांमध्ये आता महत्त्वाचे नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हे काही महत्वाचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे

प्रवासी व चालक दोघांच्याही सुरक्षितता सुविधा सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्वे.

बाईक टॅक्सीला आता पिवळ्या रंगाचे वाहन असणे बंधनकारक.

तसेच 12 वर्षा खालील मुलाला बाईक टॅक्सी वरून नेण्यास बंदी.

प्रवासादरम्यान प्रवासी व चालक या दोघांनाही स्वच्छ व पिवळ्या रंगाचे हेल्मेट घालणे सक्तीचे.

या व्यतिरिक्त चालक व प्रवासी यात विभाजक असावे संरक्षक कवच आणि जीपीएस असावे.

मुसळधार पाऊस किंवा वादळासारख्या परिस्थितीमध्ये बाईक सेवा रद्द करावी.

बाईक टॅक्सीचा प्रवास हा 15 किमी पेक्षा जास्त नसावा तसेच वेग kmp60h पेक्षा जास्त नसावा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews