MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Cold Wave Alert: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार ; तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
Cold Wave Alert: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार ; तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार 

राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेत थंडीची लाट येणार आहे. 3 ते 6 डिसेंबर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र रात्री पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात यंदा थंडी वाढताना दिसत आहे. तसंच ला निनाचा इफेक्टही पाहायला मिळू शकतो. त्यामुळे थंडीचा जोर दोन महिने राहणार आहे.

राज्याच्या काही भागांसाठी कडाक्याच्या थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे आज किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील २४ तास वातावरण स्थिर राहील. त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून, थंडीचा जोर २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात कोणत्या भागात काय स्थिती ?

महाराष्ट्रात उत्तरेला पुढचे 48 तास 3 डिग्रीने आणखी पारा घसरणार आहे. त्यानंतर तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. 1 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी यलो अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.