Marathi News

Cold Wave Alert: महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण होणार; उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल दिसण्याची शक्यता असून, राज्यभर थंडीचा कडाका वाढणार आहे. कमी दाबाचा पट्टा, खवळलेला समुद्र आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस तापमानात 2 ते 3 अंशांची घसरण होणार आहे.
Cold Wave Alert: महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण होणार; उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम

हवामान विभागाकडून आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल दिसण्याची शक्यता असून, राज्यभर थंडीचा कडाका वाढणार आहे. कमी दाबाचा पट्टा, खवळलेला समुद्र आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस तापमानात 2 ते 3 अंशांची घसरण होणार आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागांत गारठा वाढेल. दरम्यान, दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण उच्च राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विकेंडला बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर उबदार कपड्यांचा साठा आधीच वाढवून ठेवा. आगामी दिवसांत थंडीचा कडाका आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बोचरी थंडी वाढल्याने सर्दी-खोकल्याचे प्रमाणही वाढू शकते.

महाराष्ट्रात सर्वदूर थंडीचा कडाका वाढणार 

भारतीय हवामान विभागानुसार महाराष्ट्रात थंडी वाढणार असून पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी तापमान घसरणार आहे. उत्तर भारतातही थंडीची लाट कायम आहे. पूर्व किनारपट्टीवर पावसाचा इशारा मात्र कायम आहे. विकेण्डला बाहेर जायचा प्लॅन करत असाल तर स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट जरा जास्तच ठेवा, याचं कारण म्हणजे थंडीचा कडाका वाढणार आहे. बोचणारी थंडी वाढणार असल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रासही होऊ शकतो. एकीकडे कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे खवळलेला समुद्र दिवसाचा वाढणारा उकाडा आणि रात्री पडणारी कडाक्याची थंडी असं विचित्र वातावरण सध्या झालं आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील नागरिकांना थंडी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसला तरी, त्यानंतर मात्र थंडीचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. धुळ्यात 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. एकूणच महाराष्ट्रात सर्वदूर थंडीचा जोर वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

नागरिकांनो, थंडीत आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews