राज्यात पुढील तीन दिवस शीतलहरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला शीत लहरीचा इशारा देण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरला नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच राज्यातील हवामान उद्या कसे असेल, थंडीची स्थिती काय असेल ते सविस्तर जाणून घेऊ…

15 नोव्हेंबरला कसं असेल हवामान ?

राज्यात थंडीने हुडहुडी भरलेली असताना मुंबईकरांना मात्र थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईत हलका गारवा जाणवत आहे. 15 नोव्हेंबरला मुंबई शहर आणि उपनगरात स्वच्छ आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. कोकणात देखील हीच स्थिती कायम राहील. तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. पुण्यात मुख्यतः स्वच्छ हवामान राहील. परंतु किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढणार आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान 18 तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके असेल.
उत्तर महाराष्ट्र थंडीच्या कडाक्याने गारठणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 16 नोव्हेंबरला नाशिकला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे तापमान 8 अंश सेल्सिअस एव्हढं नीचांकी असेल. मराठवाड्यातदेखील पुढील तीन दिवस शीतलहरी पहायला मिळणार. छत्रपती संभाजीनगरला 16 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 नोव्हेंबरला 11 अंश सेल्सिअस एव्हढं किमान तापमान असेल.
विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भातील प्रमुख शहरे नागपूर आणि अमरावतीत किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थंडीत आरोग्याची काळजी अशी घ्या!

कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.