पुढील 24 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात येत्या 24 तासांत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ...
पुढील 24 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात अलीकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 7 जुलैला चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाने कहर केला. येत्या 24 तासांत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 25 जिल्ह्यांत चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  हवामान विभागाने राज्यातील पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला? ते सविस्तरपणे जाणून घेऊ…

पश्चिम-उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून तेथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यातील घाट भागासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहणार असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

विदर्भ-मराठवाड्यासाठी पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. परभणी आणि नांदेडच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अनुभव येण्याची दाट शक्यता आहे.विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. अकोला जिल्ह्यासाठी मात्र यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.