हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपासून धावणार; तांत्रिक चाचणी पूर्ण

Written by:Rohit Shinde
Published:
आयटी हब हिंजवडी आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित 'पुणे मेट्रो लाईन ३' (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) बाबत एक अत्यंत मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपासून धावणार; तांत्रिक चाचणी पूर्ण

दररोज हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी सुखद बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची तांत्रिक चाचणी पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे. आयटी हब हिंजवडी आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पुणे मेट्रो लाईन ३’ (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) बाबत एक अत्यंत मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे. या मार्गावरील मेट्रो सेवेसाठी अनिवार्य असलेली ‘आरडीएसओ’ची तांत्रिक तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधीपासून धावणार ?

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता मार्च २०२६ पर्यंत या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो धावण्याची दाट शक्यता आहे.  कोणताही रेल्वे किंवा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ कडून हिरवा कंदील मिळणे बंधनकारक असते. या चाचणीत काही गोष्टींची कठोर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने हाय-स्पीडमध्ये मेट्रोची स्थिरता आणि आपत्कालीन ब्रेक यंत्रणा, डब्यांची रचना आणि रुळांची तांत्रिक सुसंगतता, मेट्रो मार्गावरील विद्युत यंत्रणेची कार्यक्षमता या बाबींचा समावेश होता.

वाहतूक व्यवस्थेत मेट्रोमुळे मोठे बदल घडणार

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग पूर्ण होणे वाहतूक समस्यांवर उपाय ठरणार आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फक्त मेट्रो सुरू करणे पुरेसे नाही. प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी ई-रिक्शा, फीडर बस आणि रिक्षा यांसारख्या लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे शहरातील कोंडी आणि प्रदूषणावर फारसा फरक पडणार नाही. सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews