Marathi News

Thane Watercut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, शनिवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

Written by:Rohit Shinde
Published:
ठाणेकरांसाठी एक मोठी बातमी खरंतर समोर येत आहे. ठाणे महानगरपालिकेने शहरातील जलपुरवठा व्यवस्थेच्या उन्नतीसाठी आवश्यक पायाभूत कामे करण्याच्या उद्देशाने शनिवार, 1 नोव्हेंबर रोजी 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Thane Watercut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, शनिवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

ठाण्यातील काही भागातील नागरिकांची डोकेदुखी वाढवणारी अशी एक बातमी समोर येत आहे. कारण, शनिवारी ठाणे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे महानगरपालिकेने शहरातील जलपुरवठा व्यवस्थेच्या उन्नतीसाठी आवश्यक पायाभूत कामे करण्याच्या उद्देशाने शनिवार, 1 नोव्हेंबर रोजी 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करूनच ठेवावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा होणार प्रभावित?

पाणीपुरवठा बंदचा परिणाम वर्तकनगर आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या भागांवर होणार आहे. इंदिरानगर पंपाशी जोडलेल्या नव्या 1,168 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचं कार्यान्वयन करण्यासाठी हा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक आहे. ही जलवाहिनी ठाण्याच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

या जोडणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाकडून नितीन कंपनी जंक्शन येथे 750 मिमी मुख्य पाइपलाइनवर एक नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच पूर्ण 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या काळात प्रभावित होणाऱ्या भागांमध्ये इंदिरानगर, श्रीनगर, वरळीपाडा, कैलासनगर रेनो टाकी परिसर, रूपादेवी, रूपादेवी रेनो टाकी, रामनगर, येऊर एअर फोर्स परिसर आणि लोकमान्य नगर भागाचा समावेश आहे.

दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार !

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर दोन दिवसांपर्यंत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे, कारण प्रणालीला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे नागरिकांनी आगाऊ पाणी साठवून ठेवावे आणि बंदच्या काळात त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्या 1,168 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे उद्घाटन ठाण्याच्या जलसुविधा आधुनिक करण्याच्या आणि शहरभर समान वितरण सुनिश्चित करण्याच्या महानगरपालिकेच्या दीर्घकालीन योजनेचा एक भाग आहे. त्यामुळे सद्यस्थितीला नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews