काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. आज 25 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याचा अंदाज
उत्तर भारताकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या गारठला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असून तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त घसरण्याची शक्यता आहे. अनेक भागात दाट धुके पाहायला मिळत आहे. यामुळे महामार्गावरील दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी झाल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी या काळात निचांकी तापमानाची नोंद होताना दिसत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. थंडीचा सर्वाधिक फटका मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट नोंदवली जाऊ शकते.
उर्वरित महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. गरम कपडे वापरणे, सकाळच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे या गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





