Rain Alert: महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे संकट कायम; पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार!

Written by:Rohit Shinde
Last Updated:
महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे संकट काही केल्या दूर होण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज काही जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Rain Alert: महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे संकट कायम; पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार!

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे ढग काही केल्या दूर होताना दिसत नाही. बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणाचा परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत आहे. दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम आहे. आज अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पुढील 24 तास मुसळधार पावसाचे?

राज्यात 25 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वाढली असून 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेक भागात अवकाळीचे धुमशान

आज शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचे धुमशान पाहायला मिळाले. अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. लोकांची चांगलीच धावपळ या काळात झाल्याचे पाहायला मिळाले. शेतातील रब्बीची पेरणी केलेली पिके या पावसामुळे संकटात सापडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हवामान विभागाकडून तसा इशारा देण्यात आला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews