डोंबिवलीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महत्त्वाच्या कामासाठी 30 डिसेंबरला पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 12 तासांसाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वर्षाअखेरिस डोंबिवलीकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मनहानगरपालिकने 12 तासांचा शटडाऊन जाहीर केला आहे. 30 डिसेंबर रोजी हा पाणी पुरवठा बंद असणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाण्याच्या टाकीच्या गळक्या इनलेटवर तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
12 तास पाणीपुरवठा बंद राहणार!
येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी, डोंबिवली शहरात होणाऱ्या पाणीकपातीमुळे नागरिकांनी आधीच याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. काही तांत्रिक कामांसाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात पाणीकपात करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत तब्बल 12 तासांसाठी पाणीकपात केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामार्फत उल्हास नदीतून पाणी उचलून 150 दशलक्ष लिटर नेतिवली जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागास पाणी पुरवठा केला जातो. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात बांधण्यात आलेल्या उंच जलकुंभाचे इनलेट मुख्य जल वाहिनीस जोडणी केलेल्या टॅपिंगच्या ठिकाणी पाणी गळती होत असल्याने सदर गळती थांबविण्यासाठी पॅच क्लॅम्प काढून काही दुरूस्ती करून पुन्हा बसवायचे आहे.
या कामासाठी मंगळवार, 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत अशा एकूण 12 तासांसाठी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला होमारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कामाबाबत आणि पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबत कळवले आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे -पालिका
दुरूस्तीचे काम करण्यासाठी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार (शट डाऊन) आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना सोमवारी किंवा मंगळवारीच पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, पाणी पुरवठा बंद राहिल्याच्या दुसऱ्यादिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, डोंबिवली पूर्व आणि पश्चिममधील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.