Sun, Dec 28, 2025

KDMC WaterCut: मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार !

Written by:Rohit Shinde
Published:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी तब्बल 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेमका पाणीपुरवठा का बंद राहणार? कोणत्या एरियातील पुरवठा प्रभावित होणार, ते जाणून घेऊ...
KDMC WaterCut: मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार !

कल्याण- डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. महानगर पालिका क्षेत्रामध्ये केव्हा पाणी पुरवठा बंद असणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाणी नसणार आहे, किती वेळासाठी पाणी पुरवठा बंद असेल? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी, डोंबिवली शहरात होणाऱ्या पाणीकपातीमुळे नागरिकांनी आधीच याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. काही तांत्रिक कामांसाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात पाणीकपात करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत तब्बल 12 तासांसाठी पाणीकपात केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामार्फत उल्हास नदीतून पाणी उचलून 150 दशलक्ष लिटर नेतिवली जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागास पाणी पुरवठा केला जातो. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात बांधण्यात आलेल्या उंच जलकुंभाचे इनलेट मुख्य जल वाहिनीस जोडणी केलेल्या टॅपिंगच्या ठिकाणी पाणी गळती होत असल्याने सदर गळती थांबविण्यासाठी पॅच क्लॅम्प काढून काही दुरूस्ती करून पुन्हा बसवायचे आहे.

नागरिकांना सहकार्य करावे, पालिकेचे आवाहन

दुरूस्तीचे काम करण्यासाठी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार (शट डाऊन) आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना सोमवारी किंवा मंगळवारीच पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, पाणी पुरवठा बंद राहिल्याच्या दुसऱ्यादिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, डोंबिवली पूर्व आणि पश्चिममधील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.