Winter Season: राज्यात थंडीचा कडाका वाढला ; तापमान अचानक 4 ते 5 अंशांनी घटले !

Written by:Rohit Shinde
Published:
दक्षिण भारतात अजूनही पावसाचे सत्र कायम असून, महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाली आहे.
Winter Season: राज्यात थंडीचा कडाका वाढला ; तापमान अचानक 4 ते 5 अंशांनी घटले !

देशभरात अपेक्षेहून अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या मान्सूननं आता माघार घेतली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्यापही पावसाचं सावट कायम असून, हा मान्सून नसून समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासह चक्राकार वाऱ्यांचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यानच्या काळात आता देशभरात थंडीचं पर्व सुरू झालं असून, खऱ्या अर्थानं हिवाळा सुरू झाल्याच्या वृत्तावर केंद्रीय हवामान विभाग अर्थात IMD नं शिक्कामोर्तब केलं आहे.

राज्यात तापमान 3 ते 5 अंशांनी घटले !

राज्यात हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट होत आहे. खानदेशासह राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमान १४ अंशांच्या खाली आल्याने गारठा जाणवू लागला आहे. तथापि, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास हवामानातील घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

राज्यभरातील आजची तापमानाची स्थिती

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 31.2 कमाल आणि 17.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 17 अंशावर राहिल. यावेळी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सततच्या ढगाळ वातावरणानंतर सातारा जिल्ह्यात शुक्रवारी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आला. यावेळी 31.2 अंश सेल्सिअस कमाल आणि 18.7 किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 17 ते कमाल 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.

सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. शुक्रवारी 33.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमानात अंशत घट होऊन पारा 32 अंशावर राहिल. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहिल. दुसरीकडे राज्याच्या उत्तरेकडील धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील जिल्हयांत सध्या तापमानात मोठी घट होताना दिसत आहे.

थंडीचा जोर वाढणार !

दरम्यान, मध्य आणि उत्तर भारतात थंडी हळूहळू वाढू लागली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पूर्व भारतात तत्काळ मोठा बदल अपेक्षित नसला तरी दोन दिवसांनंतर थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एकूणच, देशात दक्षिणेकडे पावसाचं आणि उत्तर-मध्य भागात थंडीचं वातावरण दिसून येत असून, पुढील आठवडाभर हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत.

रब्बी हंगामाच्या कामाला वेग

महाराष्ट्रात हळूहळू वाढणारी थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढल्याने शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांची लागवड वेगाने सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि मोहरी यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी उत्साहाने काम करत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी ३ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews