Amrit Bharat Express : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. जळगाव, भुसावळसह संपूर्ण खान्देशाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर आणखी भक्कम स्थान मिळाले आहे. रेल्वे मंत्रालयाने पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस ही अत्याधुनिक गाडी सुरू केली असून, या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थेट थांबा देण्यात आला आहे.
ही अमृत भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र ते ईशान्य भारताला जोडणारी महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांना एका धाग्यात जोडणारी ही सेवा प्रवाशांसाठी वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल.
कसे असेल वेळापत्रक (Amrit Bharat Express)
ट्रेन क्र. 11031 पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11.50 वाजता पनवेलहून रवाना होईल आणि बुधवारी दुपारी 1.50 वाजता अलीपुरद्वारला दाखल होईल. तर ट्रेन क्र. 11032 अलीपुरद्वार–पनवेल अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 4.45 वाजता अलीपुरद्वारहून सुटेल आणि शनिवारी पहाटे 5.30 वाजता पनवेलला पोहोचेल. Amrit Bharat Express
महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे
या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडीसह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या नव्या रेल्वे सेवेने व्यापार, उद्योग, शिक्षण, नोकरी आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. जळगाव–भुसावळ परिसरातील प्रवाशांना आता उत्तर आणि ईशान्य भारतात जाण्यासाठी थेट, जलद आणि सोयीस्कर रेल्वे पर्याय उपलब्ध झाला आहे.






