Marathi News

केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालय उपचाराअभावी आणखी एका महिलेचा मृत्यू,  कुटूंबियांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप

Written by:Astha Sutar
Published:
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार
केडीएमसीच्या शक्तिधाम रुग्णालय उपचाराअभावी आणखी एका महिलेचा मृत्यू,  कुटूंबियांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप

कल्याण – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर कुटुंबामध्ये तनिषा भिषे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयाच्या विरोधात संतापाची लाट उसळत आहे. हे प्रकरण ताजे असताना आता कल्याणमधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शक्तीधाम रुग्णालयात एका महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रुग्णालयात ICU नाहीच…

दरम्यान, पुण्यातील प्रकरण ताजे असताना आता केडीएमसीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असल्यामुळे नागरिकांमधून रुग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या अंतर्गत येणाऱ्या शक्तिधाम रुग्णालयात उपचारासाठी एका महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र इथे रुग्णालयात आयसीयू नाही आणि त्यामुळे तुम्ही या रुग्णालयातून अन्य रुग्णालयात महिलेला घेऊन जावे. तिकडे उपचार करावे, असं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं. मात्र शक्तिधाम रुग्णालयातून अन्य रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला. शांतीदेवी मौर्या असं मृत्त महिलेचे नाव असून, तिच्यावर कुटुंब नियोजन आणि गर्भपातासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुटुंबाचे गंभीर आरोप…

शांतीदेवी मौर्या हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र उपचारादरम्यान तिची अचानक प्रकृती खालावल्यामुळे शक्तिधाम रुग्णालयात आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे अन्य रुग्णालयात घेऊन जाण्याचे डॉक्टरने सांगितले. दरम्यान, उपचारापूर्वी महिलेने गुटखा खाल्ल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असावी. असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र अचानक प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर काही गंभीर आरोप केलेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणि वेळेवर न सांगितल्यामुळे तसेच एवढे मोठे हॉस्पिटल असून आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याला जबाबदार डॉक्टर आणि रुग्णालय असल्याचा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, आता यावर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews