मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं आता नामकरण झालं आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव आता छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं आहे. याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं होतं. आता सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव सुद्धा बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असं केलं आहे
नामांतराची मंजुरी 15 ऑक्टोंबरलाच Aurangabad Railway Station Name Changed
नाव बदलण्याची प्रक्रिया १५ ऑक्टोबर रोजी मंजूर करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने १५ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केल्याचे शनिवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नामांतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन करण्यासाठी खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत केंद्राने नाव बदलण्यास मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचना काढून प्रक्रिया पूर्ण केली. आता रेल्वे स्थानकावर ‘छत्रपती संभाजीनगर’चा फलक झळकू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामकरणानंतर (Aurangabad Railway Station Name Changed) आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे सुद्धा नामकरण झाल्याने शहराच्या नव्या ओळखीला अधिकृत शिक्का मिळाला आहे.
1900 साली उभारण्यात आलं औरंगाबाद रेल्वे स्टेशन
औरंगाबाद रेल्वे स्टेशन १९०० मध्ये हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी बांधले होते. आजही मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून हे स्टेशन ओळखलं जातं. मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणाहून ट्रेनने प्रवास करता येतो.





