राज्यातील हवामानाच्या स्थितीमध्ये सध्या लक्षणीय बदल दिसून येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून धुक्यांमुळे दृश्यमानता थोडी कमी झाली आहे. आज 19 जुलै 2025 रोजी हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागांमध्ये आकाश ढगांनी आच्छादलेले राहील आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पावसात खंड पडला असला तरी वातावरणातील दमटपणा वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास अधिक जाणवतो आहे. नागरिक ऐन पावसाळ्यात उकाड्यामुळे हैराण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबईत तुरळक पावसाच्या सरी बरसणार
मुंबईत आज सकाळपासून आकाशात गडद ढगांनी आच्छादन केले आहे. काही भागांमध्ये हलक्या सरी पडत असून वातावरणात ओलावा जाणवतो आहे. काल सायंकाळी सायन, दादर आणि चेंबूर भागात मध्यम ते सौम्य स्वरूपाचा पाऊस पडला होता. आज दिवसभर तुरळक आणि हलक्या पावसाच्या शक्यता हवामान विभागाने वर्तवलेल्या आहेत. उष्णतेसह दमट हवामानामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
काल संध्याकाळी ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वाशी, ऐरोली आणि ठाणे स्थानक परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासून मात्र आकाश ढगांनी व्यापलेले असून हलक्या रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तापमान वाढल्यामुळे उकाडा अधिक जाणवतो आहे. आज दिवसभर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून काहीवेळा हलक्या सरींचा अनुभव येऊ शकतो. असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे,
कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पालघर जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास काही भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मात्र, आज सकाळपासून हवामान तुलनेत स्थिर आहे. कोकण भागात काल रात्रीभर संथ स्वरूपाचा पाऊस पडत होता. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही निवडक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.





