कबूतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर मुंबई महानगर पालिका आक्रमक भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्यांदा कबूतर खान्यावर महानगर पालिकेने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदा लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती त्यानंतर काल १० ऑगस्ट रोजी महानगर पालिकेकडून नवीन ताडपत्री लावण्यात आली आहे.
कबूतरखान्याबाबत पालिका आक्रमक…
ही जर ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पालिकेने कबुतरखाना ताडपत्रीच्या माध्यमातून झाकण्यात आला आहे. कबुतरखाना व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी कोणी कबुतरांना खाद्य टाकतील त्यांच्यावर देखील पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून करडी नजर असेल.
कबूतरखान्यात आतापर्यंत किती जणांकडून वसुली?
- कबूतरखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई महानगर पालिकेने 32 हजार रुपये दंड वसुल केला.
- गोरेगाव पश्चिम विभागातून पालिकेच्या PS विभागातून सर्वाधिक 6 हजार रुपये दंड वसुल.
- दादर विभागातून 5500 दंड पालिकेने केला वसुल
- पालिकेच्या वॉर्ड B, C, E, L, N या विभागातून शून्य रुपयांची वसुली
- मुंबई महानगर पालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, यामध्ये दादरमध्ये 2 गुन्हे तर गिरगांवमध्ये 1 गुन्हा दाखल.
- न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगर पालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यावर कडक कारवाईला सुरुवात.
- कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना सुरुवातीला समज देणे, त्यानंतर दंडात्मक कारवाई
- तरीही वारंवार खाद्य टाकले तर थेट पालिकेकडून कायदेशीर कारवाई
- ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेकडून घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कर्मचारी नेमणूक





