Marathi News

टीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत बदल; निर्णयामुळे इच्छुकांना मोठा दिलासा

Written by:Rohit Shinde
Published:
टीईटीसाठी उमेदवार 9 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा घेऊ शकतात. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
टीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत बदल; निर्णयामुळे इच्छुकांना मोठा दिलासा

टीईटी परीक्षेचे महत्व खूप मोठे आहे कारण ही परीक्षा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अनिवार्य टप्पा आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा पात्रता निकष म्हणून वापरली जाते. मात्र जे शिक्षक पूर्वी सेवेत दाखल झाले आहेत. त्यांना माध्यमिक शाळांमध्ये सेवा देण्यासाठी टीईटी २ वर्षांत उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभर शिक्षकांमध्ये रोष वाढताना दिसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील या परीक्षेच्या संदर्भात मोठी सूचना जारी करण्यात आली आहे. या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

09 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार अर्ज

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता उमेदवार 9 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतील. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सर्व परीक्षा मंडळे, तसेच सर्व माध्यमांच्या अनुमानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 आणि 6 ते 8 या वर्गांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केली जाते आणि 23 नोव्हेंबर रोजी घेण्याचे नियोजन आहे. TET परीक्षेच्या अधिकृत माहिती आणि तपशीलासाठी उमेदवार https://mahatet.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. परीक्षेचा पेपर 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार नियोजन कसे ?

मूळ वेळापत्रकानुसार अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत निश्चित करण्यात आली होती. तसेच उमेदवार 10 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास अडचणी आल्या. त्यामुळे परीक्षा परिषदेने अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता उमेदवार 9 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा घेऊ शकतात. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अर्ज भरू इच्छीणारे तसेच अर्ज भरण्यास उशीर झालेल्या सर्वांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews