कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी 45 टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी 40 टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. यामुळे कृषी क्षेत्रात वाटचाल करू इच्छीणाऱ्या तरूणांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली.
गुणांची अट शिथिल होणार!
कृषी विद्यापीठातील बीएस्सी (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बीटेक कृषी अभियांत्रिकी, अन्नशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण 9 पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इयत्ता बारावी (विज्ञान) मध्ये 50 टक्के गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 118 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी 40 टक्के गुणांची अट लागू करण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत 27 जुलै 2025 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या वेबसाइटवर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12 वी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (808)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 115 व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला 10 गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल असून प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल याचा आनंद आहे, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी यांनी व्यक्त केला.
कृषी पदवी काळाची गरज
आजच्या काळात कृषी पदवी ही काळाची गरज ठरत आहे. वाढती लोकसंख्या, हवामान बदल, अन्न सुरक्षेची गरज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करणे आवश्यक झाले आहे. कृषी पदवी प्राप्त विद्यार्थी केवळ शेतकरीच राहत नाहीत, तर ते संशोधक, कृषी अधिकारी, उद्योजक आणि सल्लागार बनू शकतात. नैसर्गिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे कृषी शिक्षण घेणं ही केवळ करिअरसाठीच नव्हे तर देशाच्या अन्न सुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.






