Marathi News

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती

Written by:Rohit Shinde
Published:
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला असून तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या व्यतिरिक्त, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घ्यावा, हीच आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाची भूमिका स्वच्छ नसल्याचा आरोप करून, बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका होत असतील, तर लोकशाही टिकेल का, असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार !

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या शिबिरात चेन्निथला यांनी ही घोषणा केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची तीव्र इच्छा असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, “स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी, अशी भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडली आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात हा निर्णय घेण्यात आला.” त्यांनी सांगितले की, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यास उत्सुक आहेत आणि हीच भूमिका त्यांनी वरिष्ठ नेतृत्वापुढे ठेवली.

राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास तयार?

काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी, त्यांनी इतर पक्षांसाठी चर्चेचे दरवाजे अजूनही उघडे ठेवले आहेत. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “काही पक्ष आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू.” तसेच, त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसची नेहमी नैसर्गिक आघाडी राहिली आहे, असे देखील नमूद केले. त्यामुळे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत देखील चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews