Sun, Dec 28, 2025

काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईकांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

Written by:Rohit Shinde
Published:
काँग्रेसचे कार्यकर्ते, भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईकांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. इंदिरा गांधींपासून तर राहुल गांधींपर्यंत नाईक कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत. इंदिरा गांधी यांनी सुरूपसिंग नाईक यांना आदिवासींचा सच्चा सेवक म्हणून गौरवले होते. ते काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचे वडील आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या गावी नवापूर तालुक्यातील नवागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

काँग्रेसचा एकनिष्ठ नेता हरपला; सर्वत्र शोककळा

नंदुरबारच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. या निधनाच्या बातमीने काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळा शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक हे 1981 ते 2019 राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होतीत्यांच्या या अकाली निधनाच्या बातमीने काँग्रेसच्या गोटात शोककळा पसरली आहे.

अनेक महत्वाची पदे भूषवली, काँग्रेस पक्ष वाढवला!

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना २५ सप्टेंबर रोजी १९८० रोजी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. प्रथमच मंत्री झाल्यावर त्यांना समाजकल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले. तेव्हा पासून 2009 पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेत पोहचले. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन व बंदरे अशा अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भुषवले. त्यामुळे एकुणच काँग्रेसचा राज्यातील एकनिष्ठ नेता या काळात जगातून निघून गेलेला आहे. राजकीय वर्तुळात एकनिष्ठ नेते अलीकडे अभावाने पाहायला मिळतात.