Raj-Uddhav : राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आणि ठाकरे घरातील दोन बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरुन चर्चांना उधाण आलं असताना, आता शिवसेना ठाकरे गट व मनसेचे नेते एकत्र आंदोलन आणि बैठका घेताना दिसताहेत. एकिकडे दोन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येण्यावरुन विंलब होत असताना, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मात्र एकत्र येताना दिसताहेत. त्यामुळं राज-उद्धव एकत्र येण्यापूर्वीची ही नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
मनसेकडून सावध भूमिका…
“आम्ही 2014 आणि 2017 रोजी दोन वेळा एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिला होता. परंतु उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं आता दुधाने तोंड पोळल्यामुळं ताकही फुंकून पिणार आहोत,” अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली आहे. आणि आता त्यांना गरज आहे, म्हणून ते युती करण्यास तयार असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबत गेल्या दोन महिन्यापासून चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
दोन्हीकडील नेते एकत्र कधी?
संदीप देशपांडेंनी वरळीत रक्तदान शिबिर कार्यक्रमाला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळं सर्वांचा भुवंया उंचवल्या होत्या. यावेळी मनसे-शिवसेना नेत्यांचे मनोमिलन झालं, अशा बातम्या माध्यमात प्रसारित झाल्या होत्या. यानंतर 18 जून रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं एकत्रित इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्रित आंदोलन केलं होतं. यानंतर बुधवारी (२५ जून) रोजी इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शिवसेना ठाकरे गट व मनसेनं एकत्र बैठक घेतली.





