सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये महामार्गाचं काम सुरू आहे. मुंबईत कोस्टल रोड, मुंबई ते नागपुर प्रवासासाठी समृद्धीही झालाय. शक्तिपीठ महामार्गसुद्धा लवकरच पूर्ण होईल. सरकारकडून मोठमोठं प्रकल्प राबवले जात असताना सर्वसामान्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे घाटाचा रस्ता गेल्या चार दशकात पूर्ण झालेला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
४० वर्षांपासून घाटाच्या कामाची का होतेय दिरंगाई?
१. कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी 1980 साली घाट रस्त्याची संकल्पना सरकारपुढे मांडली
२. आंदोलनांच्या रेट्यामुळे 1985 साली रस्ता मंजूर करण्यात आला
३. मंजुरीपासून 40 वर्ष उलटली तरी रस्ता कागदावरच
४. 179 राज्य मार्गातील हा 13.34 किलोमीटरचा घाटरस्ता
5. 6 किलोमीटर खासगी जमिनींचं भूसंपादन अद्याप नाही
6. 7 किलोमीटर जमीन वनविभागाच्या अखत्यारीत येते
हे ही वाचा
राज्याची समृद्धी केवळ समृद्धी महामार्गात नाही…
1985 ते 2000 या काळात या रस्त्यासाठी विविध आंदोलनं झाली, मात्र अद्याप अडथळे काही दूर होत नाही. या सगळ्या समस्या असल्या तरी, या घाटमार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी शासकीय-प्रशासकीय पातळीवर वेगानं हालचाली सुरू असल्याचं आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. आमदार महोदयांनी म्हटलं तसं आता खरंच वेगाने हालचाली झाल्या आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार झाला तर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल.
कारण राज्याची समृद्धी म्हणजे केवळ मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गापुरती मर्यादित नाही तर, कोकणातील हे लहान मोठे रस्तेही त्या समृद्धीसाठीचा मोठा वाटा उचलू शकतात..