Jalgaon Jalna Railway Project : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जळगाव ते जालना दरम्यान नवीन रेल्वे प्रकल्पाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे 174 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा आणि जलद होईल.
७,१०६ कोटी रुपयाचा खर्च (Jalgaon Jalna Railway Project)
खरं तर २०२२ मध्ये या प्रकल्पाची अधिकृत घोषणा झाली होती. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला. अखेर आता तीन वर्षांनी या प्रकल्पाला केंद्राने ग्रीन सिग्नल दिला आहे. जळगाव ते जालना या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी जवळपास ७,१०६ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. सध्या या रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक तयारी सुद्धा सुरू केली आहे.
या रेल्वे प्रकल्पातील (Jalgaon Jalna Railway Project) 70 टक्के भाग हा मराठवाड्यातील असून 30 टक्के भाग उत्तर महाराष्ट्रात आहे. या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. तसेच या मार्गावरून प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांची वाहतूक अधिक सोयीस्कर अन जलद होणार आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल
जालना जिल्ह्यातील राजूर येथील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना या नव्या रेल्वे मार्गाचा फायदा होईल. साहजिकच पर्यटकाला यामुळे चालना मिळेल. याशिवाय जळगावमधून गुजरात व राजस्थानकडील प्रवास आणि दक्षिण भारताकडे जाणारी वाहतुक अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
कुठून कशी धावणार रेल्वे
जळगाव-भुसावळ मार्गावरील भादली स्थानकापासून हा नवीन मार्ग सुरू होणार आहे, त्यासाठी जळगाव-भादली दरम्यान 9 किलोमीटरचा सहावा मार्ग तयार करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुद्धा सुरू करण्यात आले आहे.





