2025 वर्षातील अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. डिसेंबरच्या अखेरीस उत्तर भारतासह महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या राज्यांमध्ये थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. हवामान विभागाकडून राज्यभरात आज रात्री कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली देखील जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरंतर नागरिकांना या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या नागरिकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल.
आज रात्री कडाक्याची थंडी पडणार ?
उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण झाली आहे. ही घसरण आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असून तापमानातील चढ-उतार सुरूच राहतील. कोकण पट्ट्यात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव वाढू शकतो. गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले तापमान पाहिले तर मुंबई (कुलाबा) 20.4 अंश सेल्सिअस, गोंदिया 9.4 अंश सेल्सिअस, मालेगाव 9.8 अंश सेल्सिअस, नाशिक 9.6 अंश सेल्सिअस, नागपूर 10.6 अंश सेल्सिअस, पुणे 9.9 अंश सेल्सिअस, यवतमाळ 10.0 अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे नोंदवले गेले. त्यामुळे आज देखील थंडीचा प्रभाव राहणार आहे.
उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून राज्यभर गारठा वाढला आहे. डिसेंबरअखेर थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, मराठवाडा आणि राज्याच्या अंतर्गत भागांत कडाक्याची थंडी जाणवत असून मुंबई–कोकणात गारवा वाढला आहे. सकाळी आणि रात्री नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी जाणवणार आहे. उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढला असून राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. विशेषतः पुणे, मराठवाडा आणि राज्याच्या अंतर्गत भागांत थंडीचा जोर कायम असून नागरिकांना सकाळी आणि रात्री हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





