Marathi News

पोलिसांच्या कामाचे तास कमी केले पाहिजेत, पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात आक्रमक

Written by:Astha Sutar
Published:
वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्युटी व प्रवासात जाते. 
पोलिसांच्या कामाचे तास कमी केले पाहिजेत, पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात आक्रमक

Ambadas Danve – पावसाळी अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरुन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यानंतर विधानसभेतील सभागृहातही विरोधक शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले, तर दुसरीकडे विधान परिषदेत समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेतील सभागृहात आवाज उठविला.

पोलिसांच्या समस्याकडे सरकारने लक्ष द्यावे…

मुंबईत पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे नूतनीकरण होणार आहे. तसेच डिजी लोनचे प्रलंबित अर्ज निकाले काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना दिले. पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली असून, मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का? असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.

पोलिसांचे आरोग्याकडे दुर्लक्ष….

पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. तसेच पोलिसांचा प्रवासात वेळ जात असल्यामुळं योग आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. आकडेवारीनुसार सर्वाधिक पोलिसाचे मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews