राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच हवामान विभागाकडून पुढील दोन- तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची धाकधुक वाढली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई- पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील दोन- तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच बुधवारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे उद्या 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे 20 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वाातवरण पाहायला मिळत आहे. त्याबाबत अधिक सतर्क रहावे लागणार आहे. आपत्तीच्या काळात बचाव पथके सज्ज करण्यात आली आहेत.






