Sanjay Raut on Amit Shah : महाराष्ट्रात रामनवमी, हनुमान जयंती साजरी केली जात आहे. जयंती साजरी करण्याची आमची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. ही आमची श्रद्धा आहे… आस्था आहे. हनुमान जयंती आणि रामनवमींची मिरवणूक निघाली पाहिजे. पण काही लोकं या मिरवणुकांतून काहीतरी त्यांना वेगळं दाखवायचं आहे. परंतु अशा मिरवणुका ही आपली हिंदू धर्माची संस्कृती नाही. भावी पिढीला आम्ही काय देणार? देवांच्या मिरवणुकीतून हातात हत्यार, शस्त्र देऊन मिरवणुका काढल्या जातात का? मुंबईत रामनवमी आणि हनुमान जयंतीला काही मिरवणूक काढल्या गेल्या. हातात तलवारी आणि शस्त्र घेऊन मिरवणूक काढल्या. हा जल्लोष नसून हा विकृतपणा आहे. चर्च आणि मस्जिदसमोर मिरवणुका काढणे ठीक नाही. हे आता स्वतःला काही हिंदुत्ववादी म्हणून घेत आहेत, त्यांनी हा प्रकार सुरु केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

त्यांची चिडचिड का होते?

दरम्यान, तहव्वूर राणाला बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी फासावर लटकवतील आणि उत्सव करतील असे आपण म्हटला होता. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मूर्ख लोकांना उत्तर देत नाही. असे प्रतिउत्तर दिलेय. यावर बोलताना राऊत म्हणाले की, त्यांची एवढी चिडचिड का होते? एवढा संताप का करतात? कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. ते सत्तेत बसलेले आहेत परंतु त्यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून ते तसे बोलतात. त्यांनी राणाला आणले मग डेव्हिड हेडलीला का नाही आणले? यापूर्वीही 2012 मध्ये आबू सालेमला भारतात आणलं होतं. पण सरकारने याचे क्रेडिट घेतलं नव्हतं. दरम्यान, त्यांनी राणाला आणलं आहे. मग त्यांचं एक मोठं वचन होतं की, दाऊद इब्राहिला घेऊन यायचं. मग त्यांनी दाऊद इब्राहिमला घेऊन यावं… मग तुम्ही मेहुल चौक्शीला, ललित मोदी, निरव मोदीला यांना पण भारतात घेऊन या. असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

महाराजांच्या आत्म्याला काय वाटत असेल…

दुसरीकडे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे महाराष्ट्रात स्वागत आहे. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला तोडण्याचं… महाराष्ट्राला विकण्याचं जे षडयंत्र या लोकांनी रचले, ते बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला वाईट वाटत असेल. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या रक्तारक्तात आहेत. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र विकण्याचं काम या लोकांनी केलं आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चढवला.

चित्रपटाला सरकारने पाठिंबा दिला पाहिजे…

महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्राचे आणि देशाचे पहिले महात्मा आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात मोठी क्रांती केली. महिला शिक्षणासाठी त्यांचा पुढाकार आहे. महिलांसाठी पहिली शाळा त्यांनी उभारली आहे. आणि त्यांच्यावर चित्रपट आलाय. चित्रपटात दाखवले आहे ते खरे आहे. ते खोटे कुठे आहे. आणि शेवटी जे चित्रपटात दाखवले आहे, त्याचे पुरावे सरकारी पुस्तकात आहेत. मग सेंन्सॉर बोर्ड आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चित्रपट महाराष्ट्रातील एका मोठ्या महात्म्याच्या चरित्रावर आधारित आहे. त्यामुळे फुले या चित्रपटाला सरकारने पाठिंबा दिला पाहिजे. आता मी म्हटलं की, महात्मा ज्योतिबा फुले हा चित्रपट वाचवला पाहिजे. तर मुख्यमंत्री म्हणतील की ही मूर्खता आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी हा चित्रपट वाचवला पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे…

खाटीकाने बकऱ्याला लाकडावर उभं केलंय…

दरम्यान, खासदार संजय राऊतांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलीय की,
खबर पता चली क्या?
एसंशी गट…
यावर राऊतांना विचारले असता, माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला येत्या दोन-तीन दिवसात कळेल. मी जे ट्विट केले आहे ते खरं आहे. पण मी आता एवढेच सांगतो की, भाजपा महाराष्ट्रातील एक बकरा कापणार आहे. जसं खाटीक बकरा कापायच्या वेळेला त्याला लाकडावर उभा करतो. तसं महाराष्ट्रातील एकाला कापणार आहेत. हे तुम्हाला लवकरच दिसेल. तु जास्त शहाणपणा करू नकोस… नाहीतर तुझी मान उडवेल जाईल, असं दिल्लीवरून त्याच्या कानात सांगितलं आहे. असं संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटाचे नाव न घेता प्रहार केला. दरम्यान, सरकार येऊन 4 महिने झाले तरीसुद्धा अजून यांना दोन प्रमुख जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवू शकले नाहीत. अशी टीका राऊतांनी सरकारवर केली.