Mumbai Mayor : मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर; ही आहेत वादाची 8 कारणं…

Written by:Smita Gangurde
Published:
शिंदे शिवसेनेनं महापौरपदाची मागणी केली, वाद थेट दिल्लीत पोहचला.
Mumbai Mayor : मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर; ही आहेत वादाची 8 कारणं…

Mumbai News : मुंबईच्या महापौरपदावरुन राजकारण रंगलेलं असताना ही निवड आता लांबणीवर पडलीय. भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या गटाची नोंदणी झाली नसल्यानं ही प्रक्रिया लांबणीवर पडलीय. आता महापौरांची निवड फेब्रुवारीत होईल. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र महापौरपदाचा तिढा निर्माण झाला. शिंदे शिवसेनेनं महापौरपदाची मागणी केली, वाद थेट दिल्लीत पोहचला.

मुंबईत महापौर भाजपचाच होणार, हे भाजप पक्षश्रेष्ठींनी सांगितलं खरं. पण स्थायी समिती अध्यक्षपद आणि इतर समित्यांवर अद्यापही चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरुन परतल्यानंतरक 31 जानेवारीला मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र आता महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती आहे.

मुंबई महापौराची निवड लांबणीवर पडण्याची काही कारण खालीलप्रमाणे…

1. भाजप-शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी नाही
2. कोकण आयुक्तालयात अद्याप दोन्ही पक्षांकडून नोंदणी नाही
3. स्वतंत्र गट नोंदणी होणार की एकत्र याची स्पष्टता नाही
4. महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपदावरुन अजूनही चर्चा
5. स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती या चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदावरुन वाद
6. 18 प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे याबाबतही एकमत नाही
7. दोन्ही पक्षातील वाद मिटल्यानंतरच नोंदणी
8. गट नोंदणीनंतर फेब्रुवारीत महापौर निवड

महायुतीतील वाद चव्हाट्यावर

भाजप आणि शिंदे शिवसेनेतील वादामुळे महापौर निवड लांबणीवर पडलीय. ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसनं यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय. मुंबईसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर अशा महापालिकांतही शिंदे शिवसेना आणि भाजपत महापौरपदाची चुरस आहे. मुंबईच्या निर्णयावर हा महापालिकांच्या समीकरणांचाही परिणाम असणार आहे. त्यामुळे मुंबईसह या महापालिकांचे महापौरही फेब्रुवारीतच निवडले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकांत भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र चांगलं यश मिळाल्यानंतरही, वर्चस्वाच्या लढाईत महापौर निवड प्रक्रियेला विलंब झालाय. या विलंबामुळे महायुतीतील वाद मात्र चव्हाट्यावर आलेत.