Thackeray Group – गेल्या काही दिवसांपासून मंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत असताना, आज महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेत, भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री व आमदारांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.

सरकारमधील मंत्री आणि महायुतीतील नेते अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. तसेच त्यांच्या असवैदनशील कृत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळांने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे.

भेटीत काय सांगितले?

दरम्यान, मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली. तसेच यातील काही मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि असंवेदनशील कृत्य याचा पाढाही ठाकरे गटाच्या आमदारांनी वाचला. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाची माहिती पत्राद्वारे दिली आहे. कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

घोटाळ्याची माहिती दिली…

दुसरीकडे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा-भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार आदी प्रकरणाबाबत राज्यपाल यांना पत्राद्वारे ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने माहिती दिली. यावेळी आमदार मनोज जामसुतकर, आमदार नितीन देशमुख, आमदार अनंत नर, आमदार महेश सावंत, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, सुषमा अंधारे, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते.