DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या रुपानं राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. धाराशिव ते बारामती आणि आता बारामती ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास आहे. अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर, तिसऱ्या दिवशी कुटुंबावरील दु:खाचा डोंगर बाजूला सारत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. अजित पवारांच्या अघटित मृत्यूनंतर राज्याला सुनेत्रा पवारांच्या रुपानं पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.
धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील या राजकीय घराण्यातून बारामतीत पवारांच्या घरात आलेल्या सुनेत्रा वहिनींचा प्रवास आता राज्याचं नेतृत्व करण्यापर्यंत पोहचलाय.
सुनेत्रा पवारांचा प्रवास कसा आहे?
1. धाराशिव जिल्ह्यात तेरमध्ये 18 ऑक्टोबर 1963ला जन्म
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून बी कॉमपर्यंत शिक्षण
3. माहेरी पाटील कुटुंबात शेती, सहकार, समाजकारण आणि राजकारणाशी संबंध
4. बंधू पद्मसिंह पाटील 1980 च्या दशकात राजकारणात सक्रिय
5. पद्मसिंह पाटील यांनी मंत्रिमंडळात गृह, जलसंपदासारखी खाती सांभाळली
6. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांची मैत्री प्रसिद्ध
7. कौटुंबिक संबंधातून सुनेत्रांसाठी अजित पवारांचं स्थळ
8. 30 डिसेंबर 1985 ला अजित पवारांशी विवाह
9. बारामतीत अजित पवार यांच्यासोबत संसार, दोन मुलं
10. काही काळानं समाजकारण, महिला चळवळीत सहभाग
11. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त
12. पुणे विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्थांशी संबंध
13. बारामती बचतगट चळवळीत मार्गदर्शक भूमिकेत
14. बारामती परिसरात आरोग्य शिबिरं
15. 2024 साली सक्रिय राजकारणात
16. 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीत पराभव
17. 2024 साली राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या सुनेत्रा वहिनींना आता उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळालीय. या पदाला त्या न्याय देतील आणि अजित पवारांच्या कामाचा वारसा पुढे चालवतील अशा अपेक्षा व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल असताना, पक्षात नेतृत्वाची पोकळी असताना सुनेत्रा पवारांकडे हे नेतृत्व चालून आलंय. मात्र असं असलं तरी भविष्यात महत्त्वाची आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहेत.
काय असतील आव्हानं?
1. उपमुख्यमंत्रीपदी कामाचा ठसा निर्माण करणे
2. राज्याला सक्षम महिला नेतृत्व देण्याची संधी
3. भाजप-शिवसेना मित्रपक्षांशी समन्वय साधणे
4. राष्ट्रवादी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना बळ देणे
5. पुणे, पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व राखणं
6. पवार कुटुंबात समन्वय साधत परिस्थितीवर नियंत्रण
7. केंद्रात आणि राज्यात पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एका महिला नेत्याला ही मोठी संधी मिळाली आहे. सुनेत्रा वहिनींकडून राज्यातील महिलांना आणि जनतेला मोठ्या अपेक्षा असतील. सर्व संकटावर मात करत सुनेत्रा वहिनी यातून कशा मार्ग काढणार, हे पाहावं लागणार आहे.





