राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ऊसतोड कामगारांची दिवाळी नवीन घरकुलात होणार आहे. बीड जिल्ह्याने ‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत (State-sponsored Housing Scheme) अवघ्या काही महिन्यांत 50 हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करून बीड जिल्ह्याने महाराष्ट्रात (Maharashtra) पहिला क्रमांक मिळवला आहे. या निमित्ताने बीडकरांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या घरांसाठी शासनाने 990 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

 या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे. बीड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांनी यंदाची दिवाळी आपल्या नव्या घरकुलात साजरी केली, हीच या योजनेची खरी यशोगाथा आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखविलेली समर्पणभावना, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हेच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य आहे. काटेकोर नियोजन, दैनंदिन देखरेख आणि टीमवर्कचा हा विजय आहे असे अजित पवार यांनी म्हटले.

मोदींचे आभार मानले

महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अधिक उद्दिष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले. राज्यातील एकही पात्र कुटुंब हक्काच्या घराशिवाय राहणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे. बीड जिल्ह्याच्या यशस्वी मॉडेलवर आधारित ही योजना आणखी प्रभावीपणे राबवली जाईल असे अजित पवारांनी म्हटले.