Marathi News

ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट; दुरूस्तीच्या कामांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील मुसळधार पावसाचा फटका ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. शहराची पाणीपुरवठा यंत्रणा नादुरूस्त झाल्याने पुढील काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट; दुरूस्तीच्या कामांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा

राज्यातील मुसळधार पावसाचा फटका ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ठाणेकरांना बसला आहे. भातसा धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिसे पंपिंग स्टेशनच्या नदीपात्रात गाळ, झाडांच्या फांद्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. परिणामी पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरून पंपिंगची क्षमता घटली असून ठाणे शहराकडे जाणारा पाणीपुरवठा तब्बल २५ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे शहरात पुढील काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, हे यावरून स्पष्ट होते.

ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंपाच्या स्टेनरमध्ये अडकलेला गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र नदीपात्रातील पाणी अत्यंत गढूळ झाल्याने शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस ठाणे शहरात अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की पाण्याचा वापर जपून करावा, शक्य असल्यास पाणी साठवून ठेवावे आणि पिण्यापूर्वी ते नक्की उकळून घ्यावे. गढूळ पाणी वापरल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशीही सूचना करण्यात आली आहे.

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा!

महापालिकेने ही अडचण तात्पुरती असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल, असे सांगितले आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अशा समस्यांमुळे ठाणेकरांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान या काळात ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचे तसेच पाण्याच्या गरजेपुरता साठा करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आता ठाणेकरांना आरोग्याची देखील काही काळ काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे राज्यातील पावसाचा जोर कायम असल्याने दुरूस्तीच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत…

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews