MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

2 दिवसांसाठी पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; देखभाल दुरूस्तीच्या कामांचा परिणाम

Written by:Rohit Shinde
Published:
देखभाल दुरूस्तीच्या कामांमुळे पुणे शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी प्रभावित होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करावा लागणार आहे.
2 दिवसांसाठी पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; देखभाल दुरूस्तीच्या कामांचा परिणाम

पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शहरातील नागरिकांना गुरुवारी म्हणजेच आज आणि उद्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्याने शहरातील काही प्रमुख भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक शहरांमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अचानक होणाऱ्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होते. पिण्याचे पाणी साठवणे, घरगुती कामे, स्वच्छता आणि व्यवसाय यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अनेकदा पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते.

आज आणि उद्या पाणीपुरवठा विस्कळीत

यामुळे गुरुवारी 18 डिसेंबर रोजी संबंधित परिसरात पूर्ण दिवस पाणी मिळणार नाही. यापार्श्वभूमीवर पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचा आणि पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत ही कामे केली जाणार असून पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाच्या स्थापत्य घटकांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या कामांमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील, तर शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने सुरू होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा प्रभावित ?

या नियोजित बंदचा फटका शहराच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागांना बसणार आहे. येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगर (अंशतः), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी आणि जाधवनगर या परिसरांतील नागरिकांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या भागांतील रहिवासी, व्यापारी संस्था तसेच विविध आस्थापनांनी आधीच आवश्यक तेवढी पाणीसाठवणूक करून ठेवावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. पाण्याचा वापर शक्य तितका नियोजनबद्ध आणि गरजेनुसार करावा, जेणेकरून गैरसोय टाळता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेचे नागरिकांना काय आवाहन ?

देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका यंत्रणा प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाईल. मात्र, शुक्रवारी सकाळच्या वेळेत पाणी येण्यास विलंब होऊ शकतो तसेच दाब कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यानुसार तयारी ठेवावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता लप्कर यांनी केले आहे.