Marathi News

काळं-निळं पडेपर्यंत महिला वकिलाला मारलं, गुन्हाही दाखल नाही; यशोमती ठाकूरांचा गृहखात्यावर प्रहार

Written by:Arundhati Gadale
Last Updated:
जितेंद्र आव्हाड यांनी देखील महिला वकिलाला झालेल्या मारहाणीवर संताप व्यक्त केला आहे ते म्हणाले, सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य?
काळं-निळं पडेपर्यंत महिला वकिलाला मारलं, गुन्हाही दाखल नाही; यशोमती ठाकूरांचा गृहखात्यावर प्रहार

बीड : अंबाजोगाई कोर्टात प्रॅक्टीस करणाऱ्या महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना सरपंचाच्या 10 ते 12 रिंगण करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काठ्या आणि पाईपने मारहाणीमुळे रक्त साखळल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्ञानेश्वरी यांना मायक्रेनचा त्रास असल्याने त्यांनी गिरणी आणि मंदिरावरील भोंग बंद करण्यास सांगितले होते. त्यातून आपल्याला मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला.

या मारहाणीवर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि प्रशासनाला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, येवढ्या मोठ्या घटनेची सरकारकडून वेळेत दखल घेतली जात नाही, यावरून काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी गृहखात्यावर निशाणा साधला आहे. ठाकूर यांनी ट्विट करत लाडक्या बहिणींचे आम्हीच वाली असं म्हणणारं सरकार गुन्हा नोंदवण्यासाठी नेमकं कशाची वाट बघतंय? की गुन्हेगार पळून जाण्याची वाट बघितली जातेय? मुळात या राज्यात गृहखातं अस्तित्वात आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

‘ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार केली म्हणून बीडच्या आंबेजोगाई येथे महिला वकीलाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भातील माध्यमांतून येणारी छायाचित्रे अतिशय व्यथित करणारी आहेत. धक्कादायक म्हणजे महिलेला मारहाण करणाऱ्या सरपंच आणि इतर व्यक्तींविरोधात अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.’, असे देखील ठाकूर यांनी म्हटले.

केवळ बघ्याची भूमिका

महिला वकिलाला करण्यात आलेली बेदम मारहाण अतिशय संतापजनक असून झोपेचं सोंग घेतलेल्या सरकार आणि गृहखात्यानं जागं होण्याची वेळ आहे. राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. अशावेळी गृहखातं केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर ही शरमेची बाब आहे, असा टोला देखील ठाकूर यांनी लगावला आहे.

सपकाळांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

वकील महिलेला मारहाणीचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो. एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी तसेच त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड संतापले

जितेंद्र आव्हाड यांनी देखील महिला वकिलाला झालेल्या मारहाणीवर संताप व्यक्त केला आहे ते म्हणाले,
सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? अशा असंवेदनशील सरकारचा धिक्कार

Follow Us :GoogleNews