Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर ही रक्कम थेट २१०० रुपये केली जाईल, असे ठाम आश्वासन दिले होते. सरकार स्थापन होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झाले, तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये जमा झालेले नाहीत. परिणामी, सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना महिलांमध्ये अधिक तीव्र होत आहे. या अपूर्ण आश्वासनावरून विरोधकांनी सरकारला सातत्याने धारेवर धरले आहे. अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा २१०० रुपयांची घोषणा करत निवडणूक राजकारणाला वेग दिला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे –
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पार पडलेल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी महिलांना उद्देशून भावनिक भाषण केले. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा तुमचा भाऊ आज केवळ मते मागायला आलेला नाही, तर तुमचा सन्मान वाढवायला आला आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम लवकरच २१०० रुपये केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी महिलांच्या मतदानशक्तीचा उल्लेख करत, “ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला शक्ती असते, त्याचा विजय निश्चित असतो,” असे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि एक खासदार असल्याचा दाखला देत, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महायुतीचा विजय अटळ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Ladki Bahin Yojana
फक्त आश्वासनांचा पाऊस, प्रत्यक्षात कृती शून्य? Ladki Bahin Yojana
मात्र १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याची ही घोषणा महिलांच्या दृष्टीने नवी नाही. यापूर्वी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या वेळीही “योग्य वेळ आल्यावर २१०० रुपये दिले जातील” असेच आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेच आश्वासन पुढे करण्यात येत असल्याने, महिलांना केवळ मतांसाठी वापरले जात असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. “योग्य वेळ म्हणजे नेमकं कधी? निवडणुकीपुरताच आमचा सन्मान आहे का?” असा थेट सवाल लाडक्या बहिणी आता सरकारला विचारत आहेत.






