Nitesh Rane – ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत. आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मतांसाठी महाराष्ट्राचं वाट्टोळं करू नका, असा इशारा मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणेंनी आमदार जितेंद्र आव्हाडांना दिला.
दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला…
खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच जितेंद्र आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे. असं नितशे राणे म्हणाले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. असं आव्हान यावेळी नितेश राणेंनी दिलं.
बाटग्या विचारांना साथ दिली नाही…
‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका. असा इशारा नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला. तसेच आव्हाडांची जी भूमिका आहे, ती शरद पवार-सुप्रिया सुळे यांची भूमिकाही हीच आहे का? असा सवाल मंत्री नितेश राणेंनी उपस्थित करत जितेंद्र आव्हाडावर निशाणा साधला.





