महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्म भूषण पुरस्काराने गौरवले. भगतसिंग कोश्यारी यांना अशा कोणत्या कारणाने हा पुरस्कार देण्यात आला? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली. या महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता भगतसिंग कोशारी यांना केंद्राने का गौरवले याचे कारण त्यांनी सांगितले.

काय म्हणाले फडणवीस

सन 1944 मध्ये मुंबई बंदरातील मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणणलेल्या आणि मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलेल्या  ‘टर्न टेबल शिडी’या  ऐतिहासिक वाहनाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महापालिकेच्या आवारात झाले.  यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भगतसिंह कोश्यारी  यांचे जीवन प्रगल्भ आहे. त्यांचे मोठे कार्य म्हणजे वन रँक वन पेन्शन आहे. पहाडी भागात कोश्यारी यांनी मोठ काम केलं आहे. टीका करणारे छोट्या मनाचे लोक असल्याने ते विरोध करत आहेत. कोणाच्या काळात कोणाला आणि कसे गौरविले, हे आता बोलणे योग्य नाही,” असा टोला फडणवीसांनी लगावला.

राऊतांची टीका काय

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये एकूण 131 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये भगतसिंग कोशारी यांचे नाव पाहून अनेकांना धक्का बसला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान,” अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.