मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही परंतु कालच्या निवडणुकीत मराठी माणूस हरला, मुंबई हरली. फक्त दोन मराठी भावांचाच पराभव झालेला नाही तर मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचाही पराभव झालाय असं म्हणत छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. छोटा पुढारीने सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला. यावेळी मराठी माणसावर बोलताना तो अतिशय भावनिक झाल्याचे बघायला मिळालं.
काल मुंबई हरली
घनश्याम दरोडे म्हणाले, मित्रांनो निवडणूक झाली. निवडणुकीचे निकाल लागले आणि सगळीकडे फटाकड्या वाजू लागल्या. पण हे फटाके महाराष्ट्रात नव्हे तर युपी बिहारमध्ये वाजत होते. मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही, पण शेवटी मी एक मराठी माणूस आहे या नात्याने मी सांगतो की काल मराठी माणूस हरला. काल मुंबई हरली…. काल फक्त दोन मराठी माणसांचा असा नव्हे तर संपूर्ण मराठी माणसांचा पराभव झाला. मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचा गर्व बाळगणारे आपण सर्वजण काल हरलोय.
…तेव्हा मराठी अस्मितेची आठवण येईल
जेव्हा हे यूपी बिहार वाले आपल्याला तुडवतील तेव्हा आपल्याला मराठी भाषा आणि मराठी अस्मितेची आठवण येईल. 1989 ला मुंबईतील मराठी माणसांची संख्या किती होती ते बघा आणि आज मुंबईत किती मराठी माणूस आहे ते सुद्धा बघा. मुंबईत आज फक्त बोटावर मोजणी एवढी मराठी माणसं राहिले आहेत भविष्यात तेही इकडे तिकडे जातील. मुंबई आता मराठी माणसाची राहिलेली नाही. मी कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही मात्र काल आपण आपली माणसं हरवली, आपण आपले स्वातंत्र्य हरवलं आणि आपला लोकशाहीचा आधारही हरवला. मराठी माणूस हरला याचं वाईट वाटतंय असे घनश्याम दरोडे यांनी म्हटले.






