भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात. यापूर्वी विरोधकांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या पडळकरांनी आता मुस्लिम समाजाला अंगावर घेतलं आहे. मुस्लिम समाज हा भारताला युद्धाचे घर मानतो असं बेताल वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या पुस्तकात याबाबत लिहिलं असल्याचा दाखला पडळकर यांनी दिला. गोपीचंद पडळकर यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर? Gopichand Padalkar
अहिल्यानगर येथील जाहीर सभेत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर इतके हुशार होते की त्यांनी भारताची फाळणी होण्याअगोदर थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी दारुल इस्लाम आणि दारुल हरम यावर लिहिलं होते. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं घर आहे. दारुल हरम म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत. ते त्यांना इस्लामाचा घर वाटतं आणि जी मुस्लीम राष्ट्रे आहेत, ते मुस्लिमांना इस्लामचं घर वाटतं. म्हणजेच मुस्लिमांसाठी भारत हा देश युद्धाचं घर आहे. असं मी म्हणत नाही तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहून ठेवले आहे, त्या पुस्तकात तसे लिहिले असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आंबेडकरांनी सांगितलं होतं इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा
पडळकर (Gopichand Padalkar) पुढे म्हणाले, जगातले मुसलमान जी भूमिका घेतात त्याला भारतात जास्त महत्त्व देतात. खरं तर आपल्या देशाची फाळणी झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तिकडचे हिंदू इकडे आणा आणि इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा. त्यावेळी तसं केलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, असे सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.






