पुणे जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून इंदापूरमध्ये भाजपच्या राजकारणाची भिस्त ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर होती. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपात जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपवासी होणार?

हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे नाव आहे यामुळेच त्यांना फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली होती. त्यांची ही नियुक्ती भाजपने केली होती. पण भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन त्यांनी विधानसभा लढवली आणि पराभूतही झाले. सध्या भाजपने दिलेल्या अध्यक्ष पदावरून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा भाजपवासी होण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये आहे.

प्रविण मानेंचे समर्थक चिंतेत, काय होणार?

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप चर्चेचा प्रवेशामुळे माने समर्थक हे कमालीचे टेन्शनमध्ये आले आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे दोघेही भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धेत होते. आता प्रवीण माने यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये स्थिरावले असून 2029 ची निवडणूक आपण भाजपच्या तिकिटावर लढू असे माने समर्थक म्हणत आहेत. मात्र जर हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपात आले तर या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुनाच संघर्ष नव्याने पाहायला मिळू शकतो.

मुळे पक्षात दोन संभाव्य दावेदारांच्या टोकाच्या स्पर्धेचे चित्र निर्माण होईल. पाटील यांना पुन्हा तिकीट मिळाले, तर माने यांची अवस्था काय होईल? याची चर्चा सध्या माने समर्थकांमध्ये रंगली आहे. भाजपमध्ये सध्या माने यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. अशातच पाटील यांचे पुनरागमन झाले, तर दोघांचे गट एकत्र येणे राजकीयदृष्ट्या सहज शक्य नाही आणि त्यामुळे नेतृत्वातील स्पर्धा आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमामुळे पक्षबांधणी ऐवजी अंतर्गत संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे इंदापुरच्या राजकारणात आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.