मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर घडताच राजकीय वर्तुळासोबतच मनोरंजनविश्वातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली प्रतिक्रिया म्हणजे अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतची. दीर्घकाळ शिवसेना-उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेत यंदा भाजप आघाडीवर पोहोचताच कंगनाने भूतकाळातील वादाची आठवण करून देत टोला लगावला आहे.
भाजप आणि शिंदे गटाने मिळून महापालिकेत सत्ता मिळवली असून, जवळपास तीन दशकांनी उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला कोसळल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निकालावर कंगनाने प्रतिक्रिया देताना आपल्या वैयक्तिक प्रकरणाचा उल्लेख करत संताप व्यक्त केला.
काय म्हणाली कंगना
कंगना म्हणाली, “ज्यांनी माझ्यावर अन्याय केला, मला शिव्या दिल्या, माझ्या घरावर कारवाई केली… त्यांना आता जनतेनेच उत्तर दिलं आहे. माझं घर पाडणारे आज सत्तेच्या बाहेर फेकले गेले. महिलांचा अपमान करणाऱ्यांना मुंबईकरांनी जागा दाखवली याचा मला आनंद आहे.”
आधी काय घडलं होते
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बीएमसीने कंगनाच्या बांद्र्यातील कार्यालयावर कारवाई केली होती. न्यायालयानेही त्या वेळी बीएमसीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्या घटनेनंतर कंगनाने सरकारवर टीका करणारे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या होत्या. यातीलच एक जुना व्हिडिओ निकालानंतर पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कंगना म्हणताना दिसते— “आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा गर्व कोसळेल… काळाचे चक्र फिरतेच.”
महापालिकेतील सत्तांतरानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना कंगनाची ही प्रतिक्रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे, भाजपचा महापौर होण्याची शक्यता वाढल्याने मुंबईतील सत्तेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.






