Navneet Rana : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने थेट फोन करून नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकारानंतर अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, नवनीत राणा यांना याआधीही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथे केलेल्या भाषणानंतर त्यांना फोन तसेच पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळीही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला होता.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अमरावतीत भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या विजयानंतर राणा दाम्पत्याने आनंद साजरा केला. मात्र, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली होती.
मुलांच्या जन्मावरून केलं होतं विधान (Navneet Rana)
नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या मुलांना जन्म घालण्यासंदर्भातील वक्तव्यावरून ओवैसी यांनी आपल्या भाषणातून त्यांच्यावर निशाणा साधला होता. या राजकीय पार्श्वभूमीवरच आता ही धमकी आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, “बाबा सिद्दिकींसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू,” असा थेट आणि गंभीर इशारा देणारा फोन 112 क्रमांकावर आला होता. या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Navneet Rana
यापूर्वीही आली होती धमकी
दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून नवनीत राणा यांना घाणेरड्या शब्दांत धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. अवघ्या आठवडाभरात दोन वेळा धमकीची पत्रे मिळाल्याने त्यावेळीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






