Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निर्णायक भूमिका, आक्रमक शैली आणि कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांच्या जाण्याने पक्ष हादरल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झालेलं असतानाच अजित पवार यांचं निधन झाल्याने पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत संभ्रम वाढला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? Politics News
आता प्रश्न उपस्थित होत आहेत की दोन्ही गट खरोखर एकत्र येणार का? एकसंघ राष्ट्रवादीची सूत्रे कोणाच्या हाती जाणार? आणि नेतृत्वाची पुढची भूमिका कोण बजावणार? याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली असून, त्यामुळे राजकीय चर्चांना नवा वेग मिळाला आहे. Politics News
काय म्हणाले शशिकांत शिंदे
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे अजित पवार यांचे स्पष्ट मत होते. त्या दिशेने काही बैठका देखील पार पडल्या होत्या. अजितदादा शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते आणि त्याच भूमिकेतून पुढची वाटचाल केली जाईल. या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्र येणे आता केवळ राजकीय चर्चा न राहता शक्यता बनत असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीच पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही असेच वक्तव्य करत, अजित पवार यांची हीच इच्छा होती, अशी माहिती दिली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.






