Raj Thackeray : आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. आज महाराष्ट्रातील एकूण राजकीय चित्र बघितलं तरी ते गुलामांचा बाजार बघायला मिळतोय आज बाळासाहेब असते तर हे सगळं बघून किती व्यथित झाले असते असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावूक झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात आज एक कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंसोबतचे अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात दोनशे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आजही ते लिलाव सुरू आहेत, कल्याण डोंबिवली ठाणे अशा अनेक ठिकाणी हे सर्व सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं, परिस्थिती पाहून शिसारी आली. आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत ही चांगली गोष्ट आहे, तो माणूस हे पाहूच शकला नसता. त्यांना वेदना झाल्या असत्या, ते व्यथित झाले असते .
सामनामध्ये लेख लिहिला
राज ठाकरे पुढे म्हणाले, सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचं, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभे राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचिककार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर अनेक काही घडायचं, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा. बाळासाहेबांवर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो, मी आणि उद्धव तुमच्याशी तास न् तास बोलू शकतो, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.






