राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. असं खासदार संजय राऊतांनी म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊतांनी नेमका काय दावा केला ते जाणून घेऊ…
संजय राऊतांचा दावा काय?
राऊत म्हणतात की, ” मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली तशी आपल्याकडे होत नाही.”
“हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत साडेसहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात नाहीत. त्यांच्याकडे वेळ नाही आणि अशा आमदारांना राज्याचं कृषिमंत्री पद दिलं आहे” राऊतांच्या या दाव्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार अस्थिर करण्यासह घटक पक्षांत वाद निर्माण करुन देण्याचे तर हे प्रयत्न नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.”
मंत्री, लोकप्रतिनिधींचे कारनामे सुरूच
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो. विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात. नुकताच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानभवनातील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळीच गती मिळाली आहे. आता कुणावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






