उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, “अजित पवार यांच्याशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याबाबत चर्चा झाली होती” असा ठाम दावा केला आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार गटातील नेते अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार करत आहेत. या परस्परविरोधी भूमिकांमुळे आता खरंच दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
शरद पवार गटाचा मोठा आणि सावध निर्णय
गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचा आणि रणनीतीपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षाकडून आता प्रवक्ते आणि नेत्यांना विलीनीकरणाच्या विषयावर सार्वजनिक वक्तव्य न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
९ तारखेला बॉम्ब फोडणार
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चुकीचा संदेश जाऊ नये किंवा अनावश्यक संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी पवार गटाने ही सावध भूमिका स्वीकारल्याचं समजतं. दरम्यान, ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता असल्याने, संपूर्ण राज्याचं लक्ष या परिषदेकडे लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विलीनीकरणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी फक्त आमच्या पक्षाबद्दल बोलेन. कोणत्याही काल्पनिक गोष्टींवर भाष्य करणार नाही. अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने मी पक्षातील सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका कायम अजितदादांच्या निर्णयांशी सुसंगत राहिली आहे. २०२३ मध्ये आम्ही एकत्र निर्णय घेतला आणि अजितदादांसोबत उभे राहिलो. सर्व आमदारही त्यांच्या नेतृत्वाखाली राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वाखालीच पुढे गेली. आमच्याकडे निर्णय घेण्याची ठराविक आणि संघटित प्रक्रिया आहे.”






